राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेची जागा शरद पवार गटाला सोडण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एका बैठकीत तीव्र संताप व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. ठाकरे गटात सध्या दुफळी माजली असून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात राऊत हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण, राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना काँग्रेसच्या मदतीची गरज आहे, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या एका बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारीवरून माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, खासदारांच्या बैठकीत असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. यादरम्यान शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उबाठा गटाचे खासदार कोणत्यातरी गटात विलीन होण्याची शक्यता आहे, असे मोठे विधान शिरसाट यांनी केले आहे. ठाकरे गटातील टोकाचे वाद होत असून लवकरच मोठा विस्फोट होईल, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.


