सरपंच परिषदेच्या लढ्याला यश, सरपंच राहणार प्रशासक,
श्री आबासाहेब सोनवणे राज्य कोअर कमिटी प्रमुख
अहिल्यानगर-राज्यातील 14234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 अखेर संपत असल्यामुळे व सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लगेच होतील असे दिसत नसल्यामुळे, गावांचा गावगाडा सुरळीत चालण्यासाठी कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती देण्याची मागणी,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे दि-4/2/2026 रोजी केली होती. तसेच सरपंच परिषदेचे आधारस्तंभ, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय साहेबांनी विशेष पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केल्यामुळे व ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्याकडे आग्रही मागणी केल्यामुळे दि. 20 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून सरपंचांना सहा महिन्यापर्यंत किंवा निवडणुका होईपर्यंत म्हणजे यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नेमण्याचे आदेश काढले.
माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे खास पाठपुरावा करणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय साहेब यांचा सरपंच परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे,सरपंच परिषद राज्य कोअर कमिटी अध्यक्ष श्री आबासाहेब सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, राज्य कोअर कमिटी उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे,राज्य विश्वस्त आनंदराव जाधव,शत्रुघ्न धनावडे,अंबादास गुजर,राजमल भागवत,दीपक पवार,अनुप ढमाले,संजय मरकड, तानाजी गायकर व राज्यातील सरपंच परिषदेचे पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपले भाषणात बोलताना सांगितले की,सरपंच परिषदेचे अभ्यासू नेतृत्व माननीय दत्ताभाऊ काकडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून,राज्यातील मुदत संपणाऱ्या 14234 ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सहा महिन्यासाठी नवीन प्रशासकीय सरपंच म्हणून नेमणुकीसाठी प्रयत्न करू शकलो, याचे खरे श्रेय सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ काकडे,सरपंच परिषदेचे राज्याचे सर्व पदाधिकारी व सरपंच यांना जाते.
मी राज्यातील सर्व नूतन प्रशासकीय सरपंचांना मनापासून शुभेच्छा देतो, व अभिनंदन करतो. सरपंच परिषदेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी दखल घेऊन माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. याप्रसंगी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष श्री. आबासाहेब सोनवणे कोअर कमिटी उपाध्यक्ष श्री जे.डी टेमगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब व आमदार श्रीकांत जी भारतीय साहेब यांचे विशेष आभार मानले.


