अहिल्यानगर -महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ३८ शेतकऱ्यांची सुमारे ५.४३ लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी वडाळी (ता. श्रीगोंदा) येथील अविनाश भाऊसाहेब काटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ पासून सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, केडगाव येथील किरण आसाराम बोरुडे यांनी स्वतःकडे सोलर पंप योजनेची एजन्सी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्यांनी कोटेशन पद्धतीने अर्ज भरून त्वरित मंजुरी मिळवून देण्याचे तसेच १५ दिवसांत सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी शासन शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमही शेतकऱ्यांकडून उकळण्यात आली.
विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. मात्र काही दिवसांनी सर्व अर्ज अचानक ब्लॉक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चौकशीत धक्कादायक बाबी प्राथमिक तपासात अर्ज भरताना आधी चुकीचे ग्राहक क्रमांक वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या ग्राहकांचे ग्राहक नंबर वापरून अर्ज सादर करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही फसवणूक नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. आणखी काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले असल्याने एकूण फसवणुकीची रक्कम ९ लाखांहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारदारांनी संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फसवणूक करणारा एजंट किरण आसाराम बोरुडे यांनी यापूर्वी अनेक तालुक्यांमध्ये फसवणूक केल्याचे समजत आहे व त्याच्यावरती श्रीरामपूर तालुक्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता त्यांच्या हाती मोठे धागेदोरे व रॅकेट सापडू शकते असे शेतकऱ्यांचे मत आहे.


