केडगाव उपनगरात भीषण पाणीटंचाई – नागरिक त्रस्त, महापालिकेला सभापती मनोज कोतकर यांचा तीव्र अंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर : केडगाव उपनगरात मागील २ ते ३ महिन्यांपासून तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल सुरू आहेत. उन्हाळ्याचे तीव्र चटके बसत असताना देखील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास महापालिका अपयशी ठरत आहे. या संदर्भात माजी सभापती मनोज कोतकर यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोतकर यांनी सांगितले की, नागरिक वेळेवर पाणीपट्टी भरत असूनही त्यांना पाणी मिळत नाही, उलट पाणीपट्टीत वाढ केली जात आहे. काही भागात ८-८ दिवसांनी कमी दाबाने पाणी येते, तर काही ठिकाणी टँकरद्वारे होणारा पुरवठा आता २० दिवसांनी होत आहे. केडगावमधील महिला वर्गामध्ये महापालिकेविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यांना घरगुती वापरासाठी पाणी मिळत नसल्याने विकत पाणी खरेदी करावे लागत आहे. दिवसाआड होणारा टँकर पुरवठा आता महिन्यातून एकदाच होतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. शटडाऊन, विद्युत पुरवठा खंडित होणे, तसेच पंप दुरुस्तीच्या कारणांखाली महापालिकेने जबाबदारी झटकली आहे. मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. येणाऱ्या ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मनपात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे. यावेळी माजी भाजप शहर अध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, शुभम टाक, वैभव तापकिरे, संकेत काळे आदी उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव चा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची यांची बैठक बोलावून सूचना दिल्या जातील व केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


