शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते, आजही आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. जालना येथे एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंब आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले. आठवले यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, शरद पवार यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते, आजही आहेत. अजित पवारांचं म्हणणं स्पष्ट होतं, शिवसेना चालते तर भाजप का नाही? शरद पवार जर आमच्या सोबत आले असते, पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं असतं, ते देशाचे राष्ट्रपती झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा देतील, तर त्यांचं स्वागत आहे,” असं आठवले म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील, तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांनाही एकत्र यावे लागेल. पण मला वाटते, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. जर आले, तर महाविकास आघाडीत फूट पडेल. याचा फायदा आम्हाला होईल. दोघांनी एकत्र यावे, पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा बदल होणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले.


