शनिशिंगणापूर-राज्यातील हिंदू धार्मिक स्थळावरील इतर धर्मियांची भरती ही भविष्यात घातक असून हे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानवर सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते. शिंगणापूर देवस्थान वरील तेल घोटाळा, कामगार भरती घोटाळा, निधी घोटाळा आदींबाबत त्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांना दोषी ठरवत समाचार घेतला. देवस्थानने केलेल्या मुस्लिम कामगारांच्या भरतीबाबत देवस्थानच्या कारभारावर जोरदार टीका करत आगामी काळात राजकीय कॉम्प्रमाईजसाठी देवस्थानचा वापर नको, असेही आ. जगताप यावेळी म्हणाले.
हिंदुत्ववादी संघटनेचे सागर बेग यांनी कडवट टीका करून हे विश्वस्त विश्वासघातकी असल्याने हिंदूंनी या तालुक्यातील धार्मिक स्थळे जपण्याचे कार्य हाती घ्यावे, असे ते म्हणाले. तुषार भोसले यांचेही भाषण झाले. हिंदूंची एकजूट पाहता देवस्थाने एका दिवसात कर्मचारी काढून टाकण्याची घटना घडली. शनैश्वर देवस्थानच्या कारभाराबाबत विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडून देवस्थान बरखास्तीचा निर्णय घेवून हा प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी स्पष्ट केले. दीड तास आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह व्यासपीठाच्या खाली कार्यकर्त्यांच्या समवेत उभे होते. आभार तुषार वांडेकर यांनी मानले.


