2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर या दोन्ही शिवसेनेतील वाद सातत्याने पुढे आला. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे जहरी बाण भात्त्यातून निघत असतात. पण त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी भावनिक सादही घातली जाते. तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेत. गेल्या वर्षी राज्याच्या राजकारणाने नवीन वळण घेतले. या नवीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, याची चर्चा रंगली आहे.
भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. आता आपण बघतो आहे, एमआयएमची कुणासोबत युती..त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र होतील का ? तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. दोन्ही भाऊ एकत्र आले, भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? या प्रश्नांवर मंत्री गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदे सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांची भूमिका लवचिक आणि टणक आहे. भूमिका प्रत्येकाला वेगवेगळी घेता येते. त्यांची कधी भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा हा राज ठाकरे यांचा व्यक्तिगत विषय आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. मीरा भाईंदर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत असल्यावर त्यांनी भाष्य केले. आता काहीही होत आहे, असे ते म्हणाले. अंबरनाथ मध्ये 11 नगरसेवक आज आले आणि हळद फिटत नाही तोच दुसरा नवरदेव पकडला. अशी परिस्थिती आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकारणात कोणीही स्पृश्य-अस्पृश्य नसतो. सत्ता स्थापनेसाठी काहीही होऊ शकते याची प्रचिती राज्याच्या राजकारणात येत असताना आता दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावरही सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहे.


