वैष्णवी हगवणे प्रकरणात केवळ लग्नाला गेल्यामुळे अजित दादांना काही लोक टार्गेट करतात. आम्ही देखील अनेक लग्नात जातो भेटी देतो. त्यातील अनेक संसारांबाबत वेगवेगळ्या गोष्टी घडतात. मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच पळून गेली होती, मग काय करणार? त्यामुळे अशा प्रकरणात राजकीय व्यक्तींना आणलं गेलं नाही पाहिजे. त्यामुळे राजकीय व्यक्तींना अशा प्रकरणात ओढू नये. आमच्याबरोबर देखील अनेक जण फोटो काढतात. त्यानंतर काहीजण म्हणतात वाळू तस्कर आहे. हा आरोपी होता हे टाळायचं असेल तर कायदाच करावा लागेल. प्रत्येक आरोपीच्या कपड्यावर बिल्ला लावण्याची वेळ येईल, असे म्हणत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
केवळ लग्नाला गेल्यामुळे अजित दादांना काही लोक टार्गेट करतात आणि जे सध्या बोलतायेत ते शिवसेना उबाठा गटाचे असतील तर त्यांना लग्नाच्या पत्रिकाच येत नाही. ज्या लोकांना पत्रिका येत नाही त्या लोकांना कोणी लग्नात गेला तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उबाठा आणि पवार गटाच्या प्रवक्त्यांना देखील लग्नाच्या पत्रिका द्यायला सुरुवात करा असा टोला देखील सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. शिर्डी जवळील खडकेवाके येथे निळवंडे कालव्याचे जलपूजन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सुजय विखे यांनी हे भाष्य केले.
जाहिरात करून आपण प्रतिमा फक्त निर्माण करतो. यापेक्षा जनतेच्या मनात आपली प्रतिमा काय तयार होते, याला महत्त्व असतं. जलसंपदा खातं मिळाल्यावर आम्ही थांबलो नाही तर तेवढ्याच तत्परतेने कामाला लागलो. आश्वासनांवर राजकारण होऊ शकत नाही. कारण, आज जनता हुशार झाली आहे. संगमनेरमध्ये आजही पाण्याचे टँकर सुरू आहेत. त्यामुळे ते स्वतःला काय समजून घेतात यावर मी टिप्पणी करणार नाही, असे म्हणत सुजय विखेंनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. ते शिर्डी येथे बोलत होते.


