शेवगाव शहरात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अहिल्यानगर रोडवरील फलके कॉम्प्लेक्ससमोर एका मालवाहू ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली चिरडून दोन तरुणांचा अत्यंत भीषण मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३:३० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. निखिल पठाडे (वय २५) आणि विनायक शिंदे (वय २६) (दोघेही रा. वरुर बुद्रुक, ता. शेवगाव) हे आपल्या इंदिरानगरमधील एका मित्राला सोडून रस्ता ओलांडत होते.
यावेळी शेवगावहून अहिल्यानगरच्या (नगर) दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या पाठीमागच्या चाकाचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते थेट चाकाखाली आले. हा अपघात इतका भीषण होता की, एका तरुणाच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला, तर दुसऱ्या तरुणाला खाजगी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचे प्राण ज्योत मालवली.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा तोल गेल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. ऐन तारुण्यात दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने वरुर बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.
शेवगावमध्ये भीषण अपघात: ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- Advertisement -


