राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. 18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरु होण्यास उशीर झाला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनेलने कमाल करुन दाखवली. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या ( महायुती ) सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे. ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले 21 उमेदवार रिंगणात उतरवले होते.
प्रसाद लाड आणि महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनल – 7
मनसे – शिवसेना – उत्कर्ष पॅनल – 0


