पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी रस्त्यालगतच्या बारामती ॲग्रो परिसरात सोमवार (दि. ८ सप्टेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. अमन पन्नूलाल खोटे (वय ३ वर्षे, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत बालकाचे नाव आहे. अमनचा परिवार हा परप्रांतीय मजुरांचा असून, बारामती ॲग्रो परिसरात काम करत होता. अमन हा लघुशंकेसाठी घराबाहेर पडला असता, आईच्या डोळ्यांसमोरच बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मंगळवार (दि. ९) रोजी सकाळी आठ वाजता घटनास्थळापासून सुमारे १ किमी अंतरावर जंगलात झाडाझुडपात अमनचा मृतदेह आढळून आला.
शोधमोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कारले, साहेबराव भालेकर, अंकराज जाधव यांनी सहभाग नोंदवला होता. ही घटना घडण्याच्या अवघ्या सहा दिवसांपूर्वी, २ सप्टेंबर रोजी कळस येथेही बिबट्याच्या हल्ल्यात एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. आठवड्याभरात झालेल्या दोन घटनांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंजरे लावून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. तसेच गस्त वाढवण्यात आली असून, वन विभागाने नागरिकांना रात्री सावध राहण्याचे, तसेच लहान मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. पाळीव प्राण्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यांमुळेही चिंता वाढली आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक ठरत आहे. वन विभागाने नागरिकांना रात्री सावध राहण्याचे आणि मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा तपास सुरू असून, परिसरात सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.