नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील अंतरवेली या छोट्याशा गावात शनिवारी एक हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या ग्रामसेवक संदीप प्रल्हाद पाटील यांची बदली झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण गाव शोकाकुल झाले. डोळ्यात पाणी आणणारा निरोप सोहळा इतका भव्यदिव्य झाला की, तो पाहणाऱ्यांच्या मनात कायमचा घर करून राहील. गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला निरोप देताना जेवढा सन्मान केला, तेवढ्याच प्रेमाने डोळ्यातून अश्रू ढाळले. गावकऱ्यांनी खास करून संदीप पाटील यांच्या निरोप समारंभासाठी आगळ्यावेगळ्या स्वरूपात मिरवणुकीचे आयोजन केले.
गावकऱ्यांनी संदीप पाटील यांना घोड्यावर बसवून, त्यांच्या डोक्यावर भरजरी फेटा चढवला. तसेच गावभर रांगोळ्या काढून प्रत्येक रस्त्याला सणासारखे सजवण्यात आले. डीजेच्या तालावर गावातील मंडळी नाचत होते आणि महिलांनी औक्षण करून ग्रामसेवकांना शुभेच्छा दिल्या. शंभराहून अधिक महिलांनी एकत्र येऊन औक्षणाचा सोहळा पार पाडला, तर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण या मिरवणुकीत सामील झाला.
सन २०१६ मध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पाटील यांनी केवळ योजना राबवून कर्तव्य निभावले नाही, तर गावाचे खरेखुरे भविष्य घडवले. शौचालयविहीन घरांना शौचालय उपलब्ध करून देणे, पाणीटंचाईग्रस्त गावाला जलजीवन मिशनद्वारे शाश्वत पाण्याची सोय करणे, गावातील रस्ते डांबरीकरण, अंगणवाड्या व शाळांना नवा चेहरा देणे, वाचनालयाची उभारणी, तंटामुक्त गावाची ओळख निर्माण करणे आणि हागणदारीमुक्त मोहिमेत शंभर टक्के यश मिळवणे अशा विविध कामांमुळे अंतरवेली आज निफाड तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले.
याच कार्याची दखल शासनाने घेतली आणि पाटील यांना अनेक वेळा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पाटील यांची कामाची पद्धत वेगळी होती. ते गावकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेत, योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आणि ग्रामपंचायतला फक्त कार्यालयापुरती न ठेवता लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे केंद्र बनवले.
या निरोप समारंभात गावकऱ्यांनी दिलेला सन्मान ही फक्त कृतज्ञतेची भावना नव्हे, तर विकासासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या एका कर्तबगार ग्रामसेवकाला दिलेली खरी कौतुकाची थाप होती. गावकऱ्यांच्या मते, पाटील यांनी घातलेली विकासाची बीजे येत्या काळातही अंतरवेलीच्या प्रगतीचा पाया मजबूत ठेवतील.


