मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २० वर्षांनंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळत आहे. या दोघांच्या मुंबईत संयुक्त सभादेखील होणार आहेत. मात्र, त्याआधी त्या दोघांची संयुक्त मुलाखत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतली. दोन भागांमध्ये ही मुलाखत प्रदर्शित होणार असून मुलाखतीचा पहिला टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी कळीच्या मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडल्याचं दिसून येत आहे.मुलाखतीमध्ये संजय राऊत व महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरेंनी रोखठोक उत्तरं दिल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला २० वर्षं वाट का पाहावी लागली? असा प्रश्न संजय राऊतांनी मुलाखतीत विचारल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ‘ही करप्शन व कन्फ्युजनची युती आहे’ असं विधान केल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच राज ठाकरे यांनी “भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत”, अशा शब्दांत त्यावर परखड मत व्यक्त केलं.
“राज्यात सत्तेत बसवलेली माणसं आहेत सगळी, यातला बसलेला कुणीच नाहीये. आणि बसवलेला माणूस फक्त धन्याचं ऐकतो”, असं म्हणत एका उत्तरादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यात बिनविरोध निवडणुका होण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटण्यात आल्याचं कारण नमूद केलं. “बिनविरोध निवडणुका झाल्या हा वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नोटाचाही अधिकार गेला”, असं राज ठाकरे म्हणाले.
https://x.com/SaamanaOnline/status/2008746050065203366?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2008746050065203366%7Ctwgr%5E1843b44b40b7dd698024015aa49d2165cf75238f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fraj-thackeray-uddhav-thackeray-interview-teaser-sanjay-raut-mahesh-manjrekar-bmc-election-2026-pmw-88-5622184%2F
दरम्यान, राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा मदतीसाठी मनसे पण मतांसाठी नाही या तक्रारीवर भाष्य केलं. सरकारकडून निराशा झाल्यास जनता राज ठाकरेंकडे येईल, असं संजय राऊतांनी या मुलाखतीमध्ये म्हणताच राज ठाकरेंनी त्याबाबत भाष्य केलं. “आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी मुंबई-पुणे या शहरांमधील बकाल अवस्थेवर परखड भूमिका मांडली. “मुंबई बरबाद व्हायला एक काळ लोटला.. पण पुण्याला तेवढा वेळ लागणार नाही. पुणं लवकरात लवकर बरबाद होईल”, असं ते म्हणाले. “मुंबई आणि मुंबईकरांना काय हवंय, हे तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.


