शेतकऱ्यांनी पेरण्या कधी उरकाव्यात? हवामान विभागाने तारीख सांगितली राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणाला तर पावसाने चांगलेच झोडपून काढलं आहे. एकीकडे काही जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे तर काही जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या कधी करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या शेतकऱ्यांना हवामान खात्याने सल्ला देत पेरणीसाठीची तारीखच सांगून टाकली आहे.
पुणे हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ज्या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या पावसाने भरपूर ओल आहे आणि ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या. खान्देश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवार १८ ते बुधवार २५ जून आमावस्या पर्यंतच्या आठवड्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. अर्थात पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यासह आपल्या विवेकावरच घ्यावा.
‘सोयाबीनसारख्या पिकाला बक्कळ ओल आणि पूर्ण उतार होण्याची शक्यता असली तरी उतारानंतर सिंचन साधनाची उपलब्धता असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा. कारण खान्देश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात येत्या आठवड्यात सूर्यप्रकाशही जाणवू शकतो. शिवाय तुषार सिंचनासारख्या थुई-थुई पडणाऱ्या पावसाची शक्यता ही कदाचित ह्या १८ जिल्ह्यात ह्या आठवड्यात जाणवणार नाही.’, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मान्सून यंदा वेळाआधी दाखल झाला. मान्सून दाखल झाला तेव्हा पावसाचा जोर चांगला होता. पण हळूहळू कमी झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावर हवामान तज्ज्ञ म्हणाले की, ‘मान्सून प्रवाहातील कमी ताकद आणि सध्या एमजेओ त्याची ग्लोबल फेरी पूर्ण करून भारत महासागरीय विषुववृत्तीय परीक्षेत्राच्या फेज २ व ३ मध्ये एमजेओ जरी कार्यरत असला तरी त्याचा ‘एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) किंवा दोलन(ऑसिलेशन क्रेस्ट व ट्रफची) विस्तृत वाढ- मर्यादेची पातळी(एम्प्लिटुड) ही एक पेक्षा कमी जाणवते, म्हणजे ती लहर मध्य रेषेजवळच रेंगाळतांना जाणवत आहे. त्यामुळे आपल्याकडील मान्सून बळकटीसाठी त्या प्रणालीच्या पूरकतेचा अभाव व त्याचबरोबर इतर ठोकळ स्पष्ट अशा प्रणालीचा अभाव जाणवतो. त्यामुळे सध्या तरी अजून आठवडाभर म्हणजे बुधवार २५ जूनपर्यंत कदाचित खान्देश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात सध्या तरी जोरदार पावसाठी चालना मिळण्याची शक्यता जाणवत नाही. अर्थात वातावरणातील काही बदलच ह्यावर मात करू शकतो.’
मान्सूनबाबत माणिकराव खुळे म्हणाले की, ‘तीन आठवड्यापासून जागेवर खिळलेला मान्सून पुढे सरकला असून त्याने नाशिक, अहिल्यानगर संपूर्ण खान्देश, मराठवाडा आणि विदर्भासह जवळपास उत्तरेचा काही भाग वगळता महाराष्ट्र काबीज केला. मान्सून जरी पुढे सरकला तरी त्याच्या प्रवाहात सध्या म्हणावा असा विशेष जोर नाही. त्यामुळे १८ ते २५ जूनपर्यंतच्या आठवड्यात मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस राहिल. तर घाटमाथा आणि विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे.


