सध्या भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव दिसून येतोय. याचा परिणाम क्रिकेटवरही होताना दिसतोय. दरम्यान, देशात आयपीएल पुढे ढकलल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याची चिन्हं आहेत.
आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातली ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे. दरम्यान, तिकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाकच्या क्रिकेट लगीवरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे PSL चे सामने रद्द केले होते. आता PSL चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्याची चिन्हं आहेत.
बीसीसीआय आयपीएल स्पर्धा दुसऱ्या देशात शिफ्ट करण्याचा निर्णय घेऊ शकते. भारताने काही संकट ओढावलं तर इतर देशात सामने आयोजित करते. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत इतर पर्याय शोधू शकते. बीसीसीआय श्रीलंकेत काही सामने आयोजित करू शकते.
आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा शेवटचा पर्यात बीसीसीआयच्या हाती असू शकतो. कोरोना संकटात आयपीएल 2021 स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात आली होती. 4 मे 2021 रोजी आयपीएल स्पर्धा कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थगित केली होती. यानंतर आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित केला होता. पहिल्या टप्प्यात 29 सामने, तर दुसऱ्या टप्प्यात 31 सामने झाले होते.


