Monday, October 27, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २७ ते २९ ऑक्टोंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता
अहिल्यानगर, दि. २७- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक, अहिल्यानगर,बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४,२३४ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ९,४३२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धारणातून ८२० क्सूसेक, निळवंडे धरणातून ३५० क्यूसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक, घोड धरणातून ३०० क्युसेक, विसापूर धरणातून ३४२ क्यूसेक, सीना धरणातून १,०३० क्युसेक, येडगाव धरणातून विसापूर ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सूचना
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.
जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी,
विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.
नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles