नगर -तालुक्यातील जेऊर बायजाबाई शिवारात शेतात कचरा व सांडपाणी टाकण्याच्या वादातून दोन गटात मोठा राडा झाला. 15 ते 20 जणांच्या टोळक्याने लोखंडी गज, काठ्या व दगडाने केलेल्या मारहाणीत युवक जखमी झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात, भागवत मोहनकुमार मगर (वय 24) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शेतात काम करत असताना एका महिलेने त्यांच्या शेतात कचरा टाकला. याबाबत त्यांनी घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलण्याचे सांगितले असता, त्या रागातून 11 जणांसह इतर पाच ते 10 अनोळखींनी एकत्र येत लोखंडी गज, दगड व काठ्यांनी आपल्यावर हल्ला केला. मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मन्नु अलिम कुरेशी, सत्तार (मुडा) इस्माईल शेख, मुन्नीर खैरू शेख, इन्नु अलिम शेख, जिलानी नजिम शेख, सकलेम सत्तार शेख, कादिर अब्दुल शेख, सलिम अकबर शेख, इदरीस मुन्नीर शेख, दस्तगीर करीम शेख आणि वाहपरशिद पठाण यांच्यासह अनोळखी पाच ते 10 (सर्व रा. जेऊर बायजाबाई) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच घटनेच्या संदर्भात दुसरी फिर्याद एका 60 वर्षीय वृध्द महिलेकडून दाखल करण्यात आली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, शनिवारी (20 डिसेंबर) सकाळी घराची साफसफाई करत असताना कचरा चुकून रस्त्यावर पडला. त्यामुळे तो कचरा तिने जवळील कंपाऊंडच्या पलीकडे टाकला. याच कारणावरून गावातील भागवत मगर व अनिल मगर यांनी तिच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करत शिवीगाळ केली व तुम्ही गावात कसे राहता तेच बघतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


