Wednesday, October 29, 2025

जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या 13 ऑक्टोबरला गट व गण आरक्षण सोडत

अहिल्यानगर-तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची पुढील प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. दरम्यान, आधी प्रभाग रचना आणि त्यानंतर अध्यक्ष आणि सभापतीचे आरक्षण सोडती काढण्यात आल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने ते निकाली काढल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात 13 ऑक्टोबरला गट आणि गणाच्या सदस्यांचे प्रारूप आरक्षण सोडती जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर सुचना आणि हरकतीचा कार्यक्रम होवून 31 ऑक्टोबरपर्यंत गट आणि गणाचे आरक्षण जाहीर होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य सुरेश काकाणी यांनी याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात गट व गणाच्या आरक्षण सोडतीसाठी आधी अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकार्‍यांनी 6 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करणे, अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता विभागीय आयुक्तांनी 8 ऑक्टोबरपर्यंत देणे, 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे गट जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार यांनी काढणे, 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे, असे वेळापत्रक राहणार आहे.दरम्यान, 13 तारखेला काढण्यात येणार्‍या व त्यानंतर प्रसिध्द होणार्‍या गट आणि गणाच्या आरक्षणावर 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान हरकती व सुचना सादर करता येणार आहे. तसेच 17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सुचना आधारे अभिप्रायासह गोषवारा जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सुचनांचा विचार करून विभागीय आयुक्तांनी आरक्षण अंतिम करणार आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबरला गट व गणाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आल्यानंतर निवडणुकीचा मार्ग निश्चित होणार आहे.

गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग तयारीला लागले आहे. 2022 च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील दुरुस्तीनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात गट निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात 75 गट तर 150 पंचायत समिती गण झाले आहे. यापूर्वी 73 गट व 146 गण होते. आता दोन गट व चार गण वाढले आहे. ते कर्जत व जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles