नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर आता राज्याचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज अधिकृतपणे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राज्यात खालील 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत.
कोकण विभाग
1. रायगड
2. रत्नागिरी
3. सिंधुदुर्ग
पुणे विभाग
4. पुणे
5. सातारा
6. सांगली
7 कोल्हापूर
8. सोलापूर
छत्रपती संभाजीनगर विभाग
9 छत्रपती संभाजीनगर 10. परभणी
11. धाराशिव
12. लातूर
सूचना प्रसिद्धी : 16 जानेवारी
नामनिर्देशन स्वीकारणे : १६ जानेवारी ते 21 जानेवारी
छाननी : २२ जानेवारी 2026
माघारीची अंतिम मुदत : २७ जानेवारी दुपारी ३ पर्यंत
अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप : २७ जानेवारी दुपारी ३:३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत
मतमोजणी : ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून
दरम्यान, मतदान EVM च्या माध्यमातून होणार आहे. 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार आहे. एकूण 25,482 मतदान केंद्रे, सुमारे 1 लाख 28 हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रांग व प्राधान्य देण्यात येणार आहे. राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर करणे बंधनकारक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यामुळे, १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, राज्यात ५ फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे महानगरांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी रंगण्याची शक्यता आहे.


