अहिल्यानगर -नदीवरील बंधार्यात पाय घसरून पडल्याने गाळात अडकून पाण्यात बुडून एका शेतकर्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 15 जून रोजी सकाळी नगर तालुक्यातील हिंगणगाव येथील पानसरे वस्ती येथील बंधार्यांमध्ये घडली. विलास जगन्नाथ पानसरे (वय 57, रा. हिंगणगाव, ता. नगर) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.पानसरे हे घरापासून शेतीकडे रोज बंधार्यावरून जात असतात. 15 जून रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे बंधार्याच्या भिंतीवरून जात असणार्या शेवाळावर त्यांचा पाय घसरून ते खोल अशा पंधरा फूट बंधार्यांमध्ये पडले. या बंधार्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या गाळात अडकून बसल्याने त्यांना वर येता आले नाही व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली व विलास पानसरे यांचा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
मयत पानसरे यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार यादव दळवी, मंडलाधिकारी प्रताप कळसे, तलाठी विनायक दिक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी पंचायत समिती उप सभापती डॉ. दिलीप पवार, सरपंच पोपट ढगे यांनी भेट दिली.


