लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप नुकताच केला आहे. त्यांच्या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचं सादरीकरण केलं. दरम्यान, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
‘राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे, भाजपाकडून नाही’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
“आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मात्र, आजही मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याआधी दिल्लीत मला दोन व्यक्ती भेटण्यासाठी आले होते. त्या दोन व्यक्तींनी मला सांगितलं होतं की, महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी देतो. त्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्या लोकांनी जरी गॅरंटीचं सांगितलं तरी निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. पण अशा प्रकारचे लोक भेटत असतात, त्यामुळे मी त्या दोन लोकांकडे दूर्लक्ष केलं. त्या लोकांची मी राहुल गांधी यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर त्या लोकांना जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधींना बोलले. मात्र, राहुल गांधी आणि माझं मत असं होतं की याबाबतीत आपण लक्ष देऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचा पाठिंबा कशा पद्धतीने मिळेल याचा आम्ही निर्णय घेतला”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


