सावित्रीची लेक असलेल्या महिला चेअरमनला त्रास देण्याच्या उद्देशाने उपोषणाची नौटंकी – विद्युलता आढाव
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत गेल्या 25 वर्षात झाला नाही असा उत्कृष्ट सभासद हिताचा कारभार सध्या सुरू आहे .गुरुमाऊली मंडळाच्या काळामध्ये बँकेच्या सभासदांचा जेवढा फायदा झाला तो मागील कोणत्याही मंडळाच्या काळात झाला नव्हता . 25 वर्षानंतर सौ आशाताई शिरसाट यांच्यानंतर परत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची संधी मिळालेल्या बँकेच्या विद्यमान चेअरमन श्रीमती सरस्वती घुले यांनी व संचालक मंडळाने आवाहन करून देखील विरोधी मंडळी चर्चेला आली नाही त्यांनी ज्या दिवशी उपोषणाचे निवेदन दिले त्याच दिवशी त्यांना चर्चेला बसा असे सांगण्यात आले होते मात्र ते उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते यावरही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि बँकेला बदनाम करण्यासाठी उपोषणाचे नाटक केले आहे,असे प्रतिपादन शिक्षक बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन व राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्युलता आढाव यांनी केले आहे.
मागील वर्षी अपघाताने कटकारस्थान करून यांनी बँकेची सत्ता ताब्यात घेतली होती आणि त्यांच्या काळामध्ये सभासदांना पाच टक्के लाभांश देण्यात आला .यावर्षी संचालक मंडळांनी 6.10% लाभांश देण्याची शिफारस केली आहे .2019 पासून आजतागायात सभासदांना जेवढा पैसा कायम ठेवीच्या व्याजाच्या व लाभांशाच्या रूपाने मिळाला यापूर्वी तो कधीही मिळाला नव्हता .कर्जाचा व्याजदर 7% करण्याचा गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचा मानस आहे परंतु रिझर्व बँकेच्या धोरणानुसार बँकेचे कामकाज सुरू असताना आजही आपल्या शिक्षक बँकेचा कर्जाचा व्याजदर हा राज्यात पगारदार नोकरांच्या बँकेमध्ये सर्वात कमी आहे .कोणतीही नोकरभरती बँकेने केलेली नाही. पूर्वीचा 170 चा कर्मचारी स्टाफ पॅटर्न बदलून आपण 124 वर आणलेला आहे. आज बँकेमध्ये नियमित कर्मचारी फक्त 81 आहे. बँकेमध्ये कर्मचारी संख्या अपुरी असल्याने स्थानिक संचालकांना अधिकार देऊन तात्पुरत्या स्वरूपात मनधनावर कर्मचारी काम करीत आहेत.ही सर्व वस्तुस्थिती जिल्ह्यातील सभासदांना माहित आहे .फक्त बँकेची वार्षिक सभा आली की सणसणाटी बातम्या आणि इतर नाटकं करून लक्ष वेधण्याचा केविलवाना प्रयत्न काही जण करत असतात .
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने विषय पत्रिकेत जे विषय नमूद केले आहेत त्या सर्व विषयांवर वार्षिक सभेत चर्चा होणार आहे आणि सभा जो काही निर्णय देईल तो बँकेवर बंधनकारक आहे. यापूर्वी अनेक निर्णय सभासदांनी नाकारल्यानंतर संचालक मंडळाने ते रद्द केले आहेत ही वस्तुस्थिती असताना सुद्धा वार्षिक सभेच्या विषयावर उपोषणाचे नाटक करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर करण्यासारखी आहेत अशी खरमरीत टीका ही महिला आघाडीच्या कार्यकारी अध्यक्ष वनिताताई सुंबे यांनी केली आहे.
बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उभे असलेल्या विरोधी मंडळाच्या भल्याभल्या नेत्यांना त्यांची जागा सभासदांनी दाखवली आहे.परंतु दरवर्षी वार्षिक सभेच्या निमित्ताने संचालक मंडळावर बेछूट आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हा यांचा धंदा आहे .वार्षिक सभेत प्रत्येक सभासदाला बोलण्याची संधी दिली जाते. सध्या जे आरोप करता आहेत त्यांचे नेते चेअरमन असताना त्यांच्या काळात पाच मिनिटात कधीकाळी आटोपली जाणारी सभा आता नऊ नऊ तास चालविले जाते आणि प्रत्येक सभासदाचे समाधान होईपर्यंत त्यावर चर्चा केली जाते ही वस्तुस्थिती सुद्धा आता जिल्ह्याला माहित झालेली आहे .जे विषय वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेवर आहे त्याबाबत उपोषण करून उपयोग काय ? त्याचा निर्णय वार्षिक सभेतच लागणार आहे .संचालक मंडळाने चर्चेची तयारी ठेवलेली असताना ज्यांच्याकडे मुद्देच नाहीत ते चर्चेला यायला तयार नाहीत याकडेही महिला आघाडीच्या राज्य संपर्कप्रमुख मीनाक्षी अवचरे त्यांनी लक्ष वेधले आहे .
दरम्यान शिक्षक बँकेचा सभासदाभिमुख कारभार पाहता भविष्य काळामध्ये सभासदांना कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा होण्यासाठी शेड्युल बँक गरजेची आहे.बँकेच्या सभासदांच्या हितासाठीच शेड्युल बँक आणि कार्यक्षेत्र वाढीचा विषय संचालक मंडळाने मागील सर्वसाधारण सभेमध्ये घेतला होता. सहकार खात्याने मान्यता देऊनही रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यासाठी पोटनियम बदलायची गरज आहे असे सांगितल्यामुळे यावर्षी हा पोटनियम बदलण्याचा विषय संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेमध्ये ठेवलेला आहे. त्यासाठी कारण एकच आहे की फक्त आणि फक्त कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा विद्यमान संचालक मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.सभासद हिताचा कारभार पाहता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला निभाव लागणार नाही याची जाणीव झाल्याने काहीतरी सणसणाटी निर्माण करण्यासाठी नियमात नसतानाही वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेबाबत उपोषण करून विरोधी गटाने आपले हसु करून घेतले आहे असेही नगर तालुका अध्यक्षा सुवर्णा भालसिंग म्हणाल्या.
अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा एका महिला अध्यक्षाचा काळात होत असताना जिल्ह्यातील सर्वच महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वृषाली कडलग, प्रतिभाताई राऊत,जुनीपेंशन हक्क संघटनेचे महिला अध्यक्ष मीनाक्षीताई वाघचौरे, पारनेर तालुकाध्यक्ष कांताताई बनकर,अकोल्या अध्यक्ष प्रतिभाताई साबळे, राहुरी तालुकाध्यक्ष साळवे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष स्वातीताई झेंडे, संगमनेर तालुकाध्यक्ष दिपालीताई रेपाळ ,नर्गीसइनामदार, आस्मा पटेल व जिल्ह्यातील सर्व महिलांनी केले आहे..


