मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीने पुण्यात केलेल्या जमीन व्यवहाराची सारी माहिती मागविली आहे. या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण गंभीर दिसते. काही चुकीचे झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुलाच्या जमीन व्यवहाराशी आपला दुरान्वये संबंध नाही. नियमाच्या चौकटीत राहूनच काम करतो, असा दावा अजित पवारांनी केला.
कोरेगाव पार्क येथील ४० एकर जागा गैरव्यवहार प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हेे दाखल करण्याचा निर्णय राज्याच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाने घेतला आहे. या व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ संचालक असलेल्या अमेडिया कंपनीचा समावेश आहे. या कंपनीला देय मुद्रांक शुल्काची सहा कोटी रुपयांची रक्कम भरण्याबाबत नोटीसही बजाविण्यात आली असून, नियमानुसार मुद्रांक शुल्क न आकारल्याप्रकरणी सहदुय्यम निबंधकांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. प्रभारी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांनी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
महार वतनाच्या जमिनीची मूळ किंमत ही १८०० कोटी रुपयांची असताना ती ३०० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आली. तसेच २० मे रोजी या व्यवहाराची नोंदणी करताना फक्त ५०० रुपये मुद्रांक वसूल करण्यात आला. प्रत्यक्षात या व्यवहारात २० कोटी रुपयांचा मुद्रांक भरणे आवश्यक होते. अजित पवारांच्या पुत्राच्या कंपनीसाठी साऱ्या सवलती देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
पुण्यातील जमीन व्यवहाराशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी कोणाही अधिकाऱ्याला दूरध्वनी केलेला नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली. या पद्धतीचे काहीतरी सुरू असल्याचे तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर आले होते. तेव्हा मी असले काही चुकीचे केलेले मला चालणार नाही, असा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची जरूर चौकशी करावी. जेव्हा मुले सज्ञान होतात तेव्हा त्यांचे व्यवसाय करतात. पण, मी कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा इतर कोणाला मदत करा सांगितलेले नाही असा दावाही केला.
या पद्धतीचे काहीतरी सुरू असल्याचे माझ्या कानावर आले होते. तेव्हा मी असले काही चुकीचे केलेले चालणार नाही, असा इशारा दिला होता. – अजित पवार, उपमुख्यमंत्री


