उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन घोटाळ्यासंदर्भात विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आज राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेत चौकशीचे आदेश दिले. एवढंच नाही तर या जमीन खरेदी प्रकरणात एका तहसीलदारांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांबाबत पार्थ पवारांशी काही बोलणं झालं आहे का? यावर सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. ‘आत्या मी काही चूक केली नाही’, असं पार्थ पवार हे सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवर बोलताना म्हटले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनीच माध्यमांशी बोलताना दिली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“पुण्यातील जमीनीचं प्रकरण नेमकं काय आहे? हे राज्याच्या सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करायला पाहिजे. कारण सर्व संभ्रम आहे, या प्रकरणात माझे तीन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती, तर मग ती विकता येते का? जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का? दुसरा महत्वाचा मुद्दा तहशीलदार म्हणतात की मी त्यावर स्वाक्षरी केली नाही, मग जर स्वाक्षरी केली नसेल तर व्यवहार कसा झाला?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पार्थ पवारांशी काही बोलणं झालं का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हो, सकाळीच पार्थ पवारांना फोन केला आणि विचारलं की नेमकं विषय काय आहे जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार मला म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालं आहे. मग जर पार्थ पवारांचं वकिलांशी बोलणं झालं असेल तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतील”, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.


