अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अविवाहित सिंगल तरुणांची अनेकदा थट्टा उडवली जाते. याबाबतचे अनेक मिम्स आणि पोस्ट व्हायरल होतात. मात्र, प्रत्यक्षात हा प्रश्न किती गंभीर असू शकतो, याचे प्रत्यंतर अकोला जिल्ह्यातील एका तरुणाकडे पाहिल्यास लक्षात येते. या तरुणाचे लग्न होत नसल्यामुळे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहून, ‘मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही’, असे साकडे घातले आहे. ‘दैनिक लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. अकोल्यात शनिवारी शरद पवार यांनी शेतकरी (संवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी उपस्थितांपैकी काही नागरिकांनी त्यांना निवेदनं दिली. त्यामध्ये एकाकीपणा असह्य झालेल्या लग्नाळू तरुणाचे निवेदन होते. यामध्ये त्याने स्वत:चा पत्ता आणि मोबाईल नंबर दिले आहे. हे निवेदन वाचून शरद पवार यांच्यासह व्यासपीठावरील नेतेही अवाक झाले. या तरुणाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील तरुणांना किंवा शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे अनेक प्रकार सातत्याने कानावर पडत आहेत. मात्र, ही समस्या खरोखरच किती विदारक असू शकते, याचे प्रत्यंतर या तरुणाच्या पत्रातून येते. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलींची संख्या वाढली आहे. शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साहजिकच या मुलींच्या होणाऱ्या नवऱ्याविषयीच्या आणि एकूण जीवनमानाविषयीच्या आकांक्षा वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलापेक्षा शहरा भागातील नोकरदार तरुणांना मुलींची जास्त पसंती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता शरद पवार या तरुणाची इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का, हे आता बघावे लागेल.
या तरुणाने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात त्याला एकाकीपणा असह्य झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याने म्हटले आहे की, माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही, असे या तरुणाने पत्रात लिहले आहे.


