नेहरू मार्केट प्रश्नी आयुक्तांच्या भूमिकेला गाळेधारकांचा विरोध
प्रकल्पाला विरोध नसून, फक्त ग्राऊंड फ्लोअरच्या गाळ्यांसाठी ठाम भूमिका -संजय झिंजे
हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनेक वर्षांपासून रखडलेल्या नेहरू मार्केट संकुलाच्या नव्या उभारणीला अखेर महानगरपालिकेने कार्यारंभ आदेश देत गती दिली आहे. तळघर, तळमजला आणि तीन मजली असे एकूण चार मजली संकुल भाजी विक्रेते व व्यावसायिकांसाठी उभारले जाणार असून यात तळ मजल्यावर 70 ओटे व एकूण 61 व्यावसायिक गाळे उपलब्ध होणार आहेत. जुन्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची महापालिकेची योजना असली तरी तळघरात व इतर वरच्या मजल्यावर गाळे देण्याला नेहरू मार्केट गाळेधारक युनियनने तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रकल्पाला विरोध नसून, फक्त ग्राऊंड फ्लोअरला गाळे मिळण्यासाठी ठाम भूमिका दर्शविण्यात आली आहे. युनियनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयुक्तांच्या भूमिकेवर कठोर आक्षेप नोंदवला आहे.
युनियनचे म्हणणे आहे की, सर्व 70 ओटे आणि 14 मूळ गाळे हे फक्त ग्राऊंड फ्लोअरला देण्यात यावेत. कारण, “आम्ही सर्वजण पूर्वीपासून ग्राउंड फ्लोअरवरच व्यवसाय करत आलो आहोत. त्यामुळे आमचा ऐतिहासिक हक्क अबाधित ठेवला पाहिजे,” असे झिंजे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने तळमजल्यावरील काही गाळे वरच्या मजल्यावर देण्याची शक्यता व्यक्त केल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. “वरच्या मजल्यावर कुठेही भाजी बाजाराचे गाळे नसतात, मग आम्ही व्यवसाय कसा करणार?” असा सवाल युनियनने उपस्थित केला.
प्रसिद्धीपत्रकात आयुक्तांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. झिंजे म्हणाले की, महापालिकेने भाजी विक्रेत्यांना कोणतेही पुनर्वसन निश्चित न करता सध्या जागा रिकामी करून घेतली. पत्रे ठोकून त्यांना रस्त्यावर आणले. त्यांच्या उपजीविकेवर गदा आली. हे आयुक्तांचे बेकायदेशीर कृत्य आहे.”
युनियनने स्पष्ट केले की, प्रकल्पात दाखवलेल्या 61 गाळ्यांशी 14 मूळ गाळ्यांचा काहीही संबंध नाही. हे 14 गाळे हे मुळ भाजी विक्रेत्यांचे असून, महापालिकेने त्यांना गाळे देण्याबाबत हायकोर्टात हमीपत्र दिले आहे. त्यामुळे हे गाळे त्यांना कन्स्ट्रक्शन कॉस्ट या दरातच दिले पाहिजे. हा आमचा कायदेशीर हक्क असून मागणी अजिबात गैर नाही, असे झिंजे यांनी नमूद केले.
संजय झिंजे यांनी आयुक्त हे राजकीय पुढाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करत आहेत. त्यामुळे स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाहीत. या वर्तनामुळे सर्व गाळेधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप देखील केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे. वेळप्रसंगी न्यायालयात देखील दाद मागितली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आयुक्तांनी गाळे धारकांना गाळे देण्यासाठी लेखी भूमिका स्पष्ट जाहीर करावी. तडजोडीने प्रश्न न सोडवल्यास, “हुकूमशाही पद्धत खपवून घेतली जाणार नाही,” असा ठाम इशारा युनियनने दिला आहे.
प्रकल्पाला कोणताही विरोध नाही. मात्र, भाजी मंडईसाठी राखीव असलेल्या या जागेवर मूळ भाजी विक्रेत्यांचे हक्क अबाधित राहावेत, आणि ग्राऊंड फ्लोअरवरच त्यांच्या गाळ्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे झिंजे यांनी म्हंटले आहे.
नेहरू मार्केट प्रश्नी आयुक्तांच्या भूमिकेला गाळेधारकांचा विरोध
- Advertisement -


