सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याने आदिवासी समाजाला विजेसाठी 37.43 लाख रुपयांचा निधी मंजूर
स्वातंत्र्यानंतर तब्बल 79 वर्षांनी जांभूळवाडी (खडकवाडी) येथे विजेच्या कामांना मंजुरी
पारनेर :- स्वातंत्र्यानंतर तब्बल 79 वर्षांनंतर 2026 या नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील जांभूळवाडी या आदिवासी वस्तीला अखेर वीजपुरवठ्यासाठी निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने अंधारात जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणारा असून, या कामासाठी 37 लाख 43 हजार 510 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सुजित झावरे पाटील यांनी दिली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सन 2025-2026 या चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या वतीने “विद्युत विकास” या मुख्य शीर्षकाखाली आदिवासी उपयोजना (टीएसपी) व उपयोजनाबाह्य (ओटीएसपी) क्षेत्रांमध्ये ग्रामीण विद्युतीकरण व पद्धती सुधारणा या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच अंतर्गत पारनेर तालुक्यातील जांभूळवाडी येथे हा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील या वस्तीमध्ये आजवर विजेची सुविधा नसल्यामुळे आदिवासी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिक्षण, आरोग्य, दैनंदिन कामकाज तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज ही मूलभूत गरज असूनही, अनेक दशके या वस्तीला अंधारात राहावे लागले होते. येथील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे ही समस्या मांडल्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर सविस्तर मांडणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत मागणी केली. त्यानंतर तातडीने सूत्र हलली आणि हा निधी मंजूर केला गेला आहे. आता या निधीमुळे जांभूळवाडी परिसरात विद्युतीकरणाचे काम मार्गी लागणार असून, ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सुजित झावरे पाटील यांच्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून अंधारातून आता आम्ही खऱ्या अर्थाने उजेडात येणार असल्याची भावना यावेळी तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांच्या कार्याबद्दल जांभूळवाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.
“आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आलोय असून यापुढेही समाजातील वंचित समाजासाठी मी कार्य करीत राहणार आहे” असे मत सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा मिळणार असून, आरोग्य सेवा, मोबाईल संपर्क, घरगुती व लघुउद्योग यांना चालना मिळेल. त्यामुळे आदिवासी समाज अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


