राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात सहभागी होत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन, मुंबई महापालिका, परप्रांतीय मुद्दा, पायाभूत सुविधा, महायुतीतील मनभेद, महाराष्ट्राचं राजकारण, वाहतूक कोंडीसह रॅपिड फायरच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. अजित पवारांचा अपघात हा घात आहे का? या प्रश्नावरही फडणवीसांनी उत्तर दिले. रोहित पवार यांनीही आज माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी डीजीसीएकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात अजित पवारांच्या निधनानंतर संशयाचे धुके निर्माण झाले असून आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्या व्हीआरएस कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांच्याकडून होत आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर, आज रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यातच, राज ठाकरेंनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात आपली भूमिका मांडली.
रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्यावर बोलताना रोहित पवार यांनीही आज माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी डीजीसीएकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, ह्या अपघातावर तुम्हाला संशय वाटतो का? असाही प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा आपण कुठलीही पतंगबाजी करायला नाही पाहिजे. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद-प्रतिष्ठेचाही विचार आपण करायला पाहिजे. तसेच, कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे, याविषयी कुठलीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करायला नाही पाहिजे, असे मला वाटते, अशा शब्दात फडणवीसांनी उत्तर दिले. त्यामुळे, याप्रश्नावर मी अधिक बोलू इच्छित नाही.


