सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
प्रशासक म्हणून सरपंचांची नेमणूक
अहिल्यानगर- मंत्रालय मुंबई येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे वतीने ,प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे,राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे,यांनी सरपंच परिषदेचे राज्यातील पदाधिकारी यांचे सोबत,राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन राज्यभरातील मुदत संपलेल्या हजारो ग्रामपंचायतीच्या सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत जाहीर केलेल्या निर्णयाबद्दल, आभार व्यक्त केले आहेत.
राज्यातील हजारो ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 अखेर संपल्यामुळे व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्यात यावे,याबाबत सरपंच परिषदेचे अध्यक्ष व राज्य पदाधिकारी यांनी ना.जयकुमार गोरे यांना निवेदन दिले होते व त्यासाठी सतत पाठपुरावा देखील केला होता.
सरपंच परिषदेच्या या मागणीनुसार राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत महत्त्वाचा असा ऐतिहासिक निर्णय घेत, प्रशासक पदाचा गुंता सोडवला आहे आता दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे त्या सर्व ठिकाणी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे, त्यामुळे गाव पातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, मात्र राज्यातील ग्रामपंचायतची संख्या लक्षात घेता आणि विस्तार अधिकारी यांची मर्यादित उपलब्धता याचा विचार करून सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी यांच्या नेमकी पासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतची निवडणूक पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल तेवढाच कालावधी राहणार आहे.
या प्रसंगी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गावांमधील विकास कामे गाव गाड्यांच्या समस्या तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा केली,त्या सर्व सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे व ठोस पावले उचलण्याचे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिले. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे,राज्य उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, कोअर कमिटी उपाध्यक्ष जे.डी टेमगिरे,विश्वस्त आनंदराव जाधव,शत्रुघ्न धनावडे, राजमल भागवत,दीपक पवार,अनुप ढमाळ, तानाजी गायकर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,अहिल्यानगर, लातूर, नांदेड,धाराशिव,जळगाव,बीड, संभाजीनगर,जालना,नाशिक इत्यादी जिल्ह्यातून आलेले सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
“सरपंच परिषदेच्या अथक प्रयत्नामुळे राज्य शासनाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक विद्यमान सरपंचांची नेमणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, या काळामध्ये अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली असून ,अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून यावर प्रशासकीय सरपंचांना योग्य नियोजन करून पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे राज्यातील सर्व नवीन प्रशासकीय सरपंचांचे हार्दिक अभिनंदन व पुढील प्रशासकीय कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा.
श्री आबासाहेब सोनवणे राज्य कोअर कमिटी प्रमुख सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र”.


