अहिल्यानगर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावरचा देण्यात येणारा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार’ अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जाहीर करण्यात आला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी दिनांक १८ मार्च रोजी शिरूर तालुक्यातील वढू येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. रुपये ५१ हजार, ऐतिहासिक स्मृतिचिन्ह व संभाजी महाराजांच्या चरित्र विषयीची सगळी ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जे हिंदू कार्यासाठी व रक्षणासाठी काम करतात अशांना हा पुरस्कार देण्यात येतो, अशी माहिती समस्त गो रक्षक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी नगरमध्ये दिली.
या पुरस्काराच्या घोषणेसाठी धर्मवीर संभाजी महाराज स्मृति समितीचे उपाध्पक्ष शांताराम भंडारी, कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारी व गो रक्षक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे तसेच शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी आ.संग्राम जगताप यांनी भेट घेतली व अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मनापा गटनेते प्रकाश भागानगरे, माणिक विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, कमलेश भंडारी आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना मिलिंद एकबोटे म्हणाले, दि.१८ मार्च फाल्गुन अमावास्या ही छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने दरवर्षी संभाजी महाराजांचे स्मृती स्थान शिरूर तालीक्यातील वढू या ठिकाणी मोठ्या व भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यकमात राष्ट्रीय स्तरावरच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार’ देण्यात येतो. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी समर्पित भावनेने काम केले आहे अशांनाच संभाजी महाराजांच्या आशीर्वाद स्वरुपात हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. येत्या १८ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर आ.संग्राम जगताप यांना देण्यात येणार आहे. असा निर्णय समस्त वढू ग्रामस्तांनी व धर्मवीर संभाजी महाराज स्मृति समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने घेत्लन आहे.यावेळी गोशाळा महासंघ सचिव गौतम कराळे, हिंदु राष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष संजय अडोळे, विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे, गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे नाना आठरे, गुरु नाना मोरे, श्रीकांत नदापुरकर, मनोज फुलारी, भागवत कुरधने, मुकुल गंधे व दिनेश जोशी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


