सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती करण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डाचा नवीन शिक्षणक्रम जाहीर करण्यात आला असून नवीन शिक्षण क्रमानुसार सीबीएसई बोर्डाने इयत्ता सहावी पासून तीन भाषा विषय आणि इयत्ता नववी पासून गणित आणि विज्ञानाचे द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे. सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावी वर्गापासून पुढील वर्षी शिकवल्या जाणाऱ्या तीन पैकी दोन भारतीय भाषा असतील. सोबतच तिसरी भाषा 42 भाषांपैकी एक भाषा ही विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा निवडायची आहे.दरम्यान, येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकाव्या लागतील तर परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन भाषांच्या अटीतून सूट असेल त्यासोबतच मंडळाने पुढील वर्षीपासून गणित आणि विज्ञानासाठी नेहमीच्या ऐंशी गुणांच्या परीक्षा व्यतिरिक्त आणखी एक पर्याय दिला आहे. ही परीक्षा 25 गुणांची असून त्यात संबंधित विषयाची आकलन क्षमता कसोशीने तपासली जाणार आहे. यातील गुण एकूण गुन्ह्यांमध्ये समाविष्ट न करता त्याची गुणपत्रिकेवर वेगळी नोंद करण्यात येईल, अशी देखील माहिती आहे.
आतापर्यंत, बहुतेक शाळांमध्ये केवळ दोन भाषा अनिवार्य विषय म्हणून होत्या. नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त भाषा शिकणे आवश्यक असेल. यामुळे त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती वाढेल, तसेच विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकण्याची आणि समजून घेण्याची संधीही मिळेल. सीबीएसईचा विश्वास आहे की, यामुळे मुलांच्या विचारशक्तीचा विकास होईल आणि विविध भाषा व संस्कृतींबद्दलची त्यांची समज वाढेल.नवीन पद्धतीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वी हा मधला टप्पा मानला जातो. या काळात तिसऱ्या भाषेचा अभ्यास सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना ती शिकण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. सीबीएसईच्या मते, अनेक विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा पूर्णपणे नवीन असू शकते. त्यामुळे, ती समजून घेण्यासाठी, बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सराव आणि वेळ आवश्यक आहे.अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, भाषा केवळ अभ्यासाचा विषय नाही, तर संस्कृती आणि समाजाशी जोडले जाण्याचे एक साधन देखील आहे. भारतात अनेक समृद्ध भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. जेव्हा विद्यार्थी एकापेक्षा जास्त भारतीय भाषा शिकतील, तेव्हा त्यांना देशाची विविधता अधिक चांगल्या प्रकारे समजेल. यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना देखील दृढ होईल.


