शेवगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उपनेते अरुण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत आमदार मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका करीत आमदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष व्हा आणि नगराध्यक्ष माया मुंढे यांना आमदार करा, असा खोचक टोला लगावला.
शहराच्या सर्वांगीण पाणीपुरवठा सुधारण्यासाठी संभाजीनगर येथील यश इनव्हेटिव्ह सोल्युशन कंपनीकडून नव्या योजनेचे सादरीकरण करण्यात आले. या योजनेनुसार 123 किमी पाइपलाईन वाढवून 266 किमी करण्यात येणार असून, 143 किमी अतिरिक्त पाईपलाईन टाकली जाणार आहे.
प्रत्येकी 8 लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारले जाणार आहेत. सुमारे 75 हजार लोकसंख्येसाठी 14 हजार नळजोडण्या देण्याचे नियोजन आहे. योजना सात झोनमध्ये विभागली जाणार आहे. यासाठी 50 ते 60 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात येणार असून जायकवाडी धरणातून पाणी उचलून गहिले वस्ती येथील शुद्धीकरण केंद्राद्वारे शहरात पुरवठा केला जाणार आहे. ही योजना वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पूर्वीच्या योजनेत मानव सेवा (धुळे) व राजेंद्र सनेर या कंपन्यांनी शहरातील सुमारे 55 टक्के भाग वगळल्याचा आरोप मुंढे यांनी यावेळी केला. नव्या योजनेत हा भाग समाविष्ट करून अतिरिक्त निधीचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही नगरसेवकांना विशिष्ट कंपनीच्या बाजूने मतदान करण्यासाठी फोनद्वारे दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही मुंढे यांनी केला. मात्र, नगरसेवकांनी दबाव झुगारून संबंधित कंपनीला नाकारल्याचे ते म्हणाले. भविष्यात अशा हस्तक्षेपाचे रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या 9 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोल्हापूरच्या स्वस्तिक कंपनीला मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून सभागृहात खडाजंगी झाली. कामातील त्रुटींमुळे मुदतवाढ देण्याची गरज असल्याचा एक गटाचा दावा असताना काही नगरसेवकांनी ब्लॅकलिस्टची मागणी केल्याने वाद चिघळला. लेखी तक्रार नसताना केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे, असा आरोप मुंढे यांनी केला.
मुंढे यांनी भाजप व काही नगरसेवकांवर शहराच्या विकासकामांत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केल्याचा आरोप करीत, वादग्रस्त एजन्सींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. पाणीयोजनेत खोडा घालण्याचे राजकारण सुरू असल्याचाही त्यांनी आरोप केला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, ताहेर पटेल, पिनू मगरे, आशुतोष डहाळे, कैलास तिजोरे, अमर पुरनाळे, साईनाथ आधाट, बाबासाहेब लांडे, प्रवीण भारस्कर, रोहित काथवटे, हरीश भारदे, संतोष जाधव, जाकीर कुरेशी, नंदू मुंढे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


