पुढील वर्षभरात सोनं खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेल मर्यादित वापरा, डेस्टिनेशन्स वेडिंग टाळा असे अनेकविध आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. पश्चिम आशियातील अस्थिर वातावरणामुळे इंधन साठ्याचा तुटवडा निर्माण झाला असताना मोदींनी अशी वक्तव्य केल्याने सामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. यावर आता खासदार शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.
काळजी निर्माण करणारी बाब
“मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे”, असं शरद पवार म्हणाले.
सर्व पक्षीय बैठक बोलवा
देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते. यावेळीही अशीच बैठक बोलावली गेली पाहिजे, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले, “या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच पंतप्रधानांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे”, अशी ठाम भूमिका शरद पवारांनी व्यक्त केली.
https://x.com/PawarSpeaks/status/2054060176450420887?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2054060176450420887%7Ctwgr%5Ed3d6e93d91aa9286cdd095b00cce2df11d770a8e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fsharad-pawar-reaction-on-pm-modi-economic-announcements-impact-india-economy-sgk-96-5892669%2F
नागरिकांमध्ये अस्वस्थता… काळजी वाढली…पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर शरद पवार म्हणाले…
- Advertisement -


