लासलगाव बाजार समितीत अलीकडेच आंदोलन केल्यामुळे केंद्र सरकारने सरकारी कांद्याचा खरेदी दर प्रति किलोस साडेतीन रुपयांनी वाढवला. आता हाच दर २४ रुपये प्रति किलोपर्यंत नेला पाहिजे, यासाठी चांदवड येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे केले जात असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केले.
नाशिकच्या चांदवड येथे आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज कांदा उत्पादकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
https://x.com/RRPSpeaks/status/2059173188584829192?s=20
या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी अपडेट दिली आहे. कांद्याचा विषय खरा असून शेतकरी अडचणीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
कांद्याच्या घसरलेल्या दरांवरून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नवी दिल्लीत एक हायव्होल्टेज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अमित शाह यांच्यासमोर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व मुद्दे, हमीभाव आणि अनुदानाचा विषय मांडले जाणार आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, जयकुमार रावळ यांसह इतर २ महत्त्वाचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल.


