राज्यात नागरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘नागरी व ग्रामीण लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. या मोहिमेत रिक्त पदे भरण्यापासून ते महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यापर्यंतच्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांचा समावेश आहे.
नागरी भागात नवीन ‘आपला दवाखाना’
या अभियानांतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या क्षेत्रात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ३५१ ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे आणि २६ ठिकाणी ‘पॉलिक्लिनिक’ कार्यान्वित केली जातील. याशिवाय राज्य योजनेतून ३१ नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणावर पदभरती
या नवीन आणि विद्यमान आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने विशेष मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण ६ हजार २५८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्य योजनेंतर्गत (आपला दवाखाना) वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण ५६५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. नागरी क्षेत्रांसाठी आशा स्वयंसेविकांची १ हजार ९५ पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.


