कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसला अनेकदा संकटात बाहेर काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जून २००२ मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार संकटात सापडलं होतं. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. अनेक आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला.
आमदार फुटून सत्ता जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काँग्रेस हायकमांडनं कर्नाटक सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या डी. के. शिवकुमार यांच्यावर आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवली. तेव्हा कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं. शिवकुमार यांनी अजिबात वेळ न दवडता ४० आमदारांना बंगळुरुच्या बाहेर असलेल्या इगलटन गोल्फ रिसॉर्टमध्ये ठेवलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना पक्ष श्रेष्ठींनी
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं. काँग्रेस नेतृत्त्वानं त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आणि दिल्लीत मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन दिलं आहे. डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रं जाण्याची दाट शक्यता आहे. ते सध्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे संकटमोचक नेते अशी त्यांची ओळख आहे.
सिद्धारमय्या यांना २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. ‘तुम्ही ओबीसी समाजाचा मोठा चेहरा आहात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. पक्षाच्या नेतृत्त्वाला तुमची दिल्लीत गरज आहे. त्यामुळे तुम्ही दिल्लीत यायला हवं,’ असा स्पष्ट संदेश सिद्धारमय्या यांना देण्यात आलेला आहे.


