नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात एक असं लग्न पार पडलंय, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रासमोर सामाजिक बांधिलकीचा एक नवा आणि अनोखा आदर्श निर्माण केलाय….लग्नकार्यातून समाजसेवेचा हा अनोखा पॅटर्न नेमका काय आहे.कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात… सिद्धेश्वर आणि मंजुषा यांच्या विवाह सोहळ्यासाठी गावकऱ्य़ांची गर्दी जमली होती आणि पेठकर कुटुंबियांनी गावालाच एक अनोखा आहेर दिला….. पेठकर परिवारातील या विवाह सोहळ्यात पारंपरिक रीतीरिवाजांना फाटा देत, उधळपट्टी टाळत प्रत्येक गावकऱ्यांचा विमा काढला..
ग्रामीण भागात आजही अपघातासारख्या अनपेक्षित संकटांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतात. अशा वेळी हक्काचा आर्थिक आधार देणारी ‘विमा पॉलिसी’ काढून देण्याचा निर्णय पेठकर कुटुंबियांनी घेतला…गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, अशा तब्बल 3500 नागरिकांचा ‘अपघाती विमा’ या कुटुंबाने स्वतःच्या खर्चातून काढलाय..त्यामुळे ‘लग्नात आहेर घ्यायचा आणि द्यायचा’ हा जुना पायंडा मोडीत काढत, संपूर्ण गावालाच सुरक्षेचं कवच देणाऱ्या सिद्धेश्वर आणि मंजुषाच्या या ‘सोशल’ लग्नाची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
दरम्यान नव्या आयुष्याची सुरुवात करताना एका चांगल्या उपक्रमात सहभागी होता आलं याचा आनंद नवरीच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळाला….
विम्यासारख्या गोष्टीबद्दल ग्रामीण भागात अजूनही म्हणावी तशी जागरूकता नाही. मात्र बहादरपुरातील या जोडप्यामुळे लोकांना भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व पटेल आणि ऐनवेळी कुटुंबाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. फक्त भाषणं ठोकून किंवा पोस्ट टाकून समाजसुधारणा होत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते, हेच बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबियांनी दाखवून दिलयं… या अनोख्या विवाह सोहळ्यानं समाजसेवेचा एक नवा पायंडा पाडला…. हे मात्र निश्चित.


