राज्यात दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा तशी मागे पडली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच याबाबत संकेत दिलेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनीही आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे सांगितलेले आहे. आता दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष आपापल्या मार्गाने राजकारण करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पक्ष सत्तेत आहे तर खासदार शरद पवार यांचा पक्ष विरोधी बाकावर आहे. दरम्यान, आता ही चर्चा मागे पडलेली असली तरीही नुकतेच भाजपात गेलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा विलीनीकरणाचा हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरातील नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतेच भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती. हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना मी एका बैठकीला होता. या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होत्या. त्या बैठकीला दिवंगत नेते अजित पवार हेदेखील होते. ही बैठक माजी मंत्री तथा आमदार जंयत पाटील यांच्या निवासस्थानी झाली होती, अशी माहिती तनपुरे यांनी दिले. तसेच त्या बैठकीला अजितदादा एकटेच होते, असेही तनपुरे म्हणाले.
दरम्यान, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असे सांगितले जात होते. त्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील सर्वच नेते अनुकूल होते. अजित पवार यांच्या पक्षातर्फे मात्र कोणत्याही नेत्याने तेव्हा प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांनी आमचा पक्ष सत्तेत आहे. विलीनकरण होणार म्हणजे कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनूकरण होणार? शरद पवार यांचा पक्ष सत्तेत सामील होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत खासदार तथा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी विलीनीकरण होणार नसल्याचे सांगून टाकले होते. त्यानंतर विलीनीकरणाची चर्चा हळूहळू विरून गेली.


