टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती
अहिल्यानगर, दि. १६ : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन वांबोरी चारीच्या दोन्ही टप्प्यांतील कामांसाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या केटीवेअर व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टंचाई निवारणासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, प्रांताधिकारी प्रसाद मते, सभापती सुभाष बर्डे, राहुल राजळे तसेच विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. टंचाईच्या काळात सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या अडचणींना प्राधान्याने प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी सांगितले. शेवगाव शहरात सध्या १७ ते १८ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पाथर्डी शहरातही पाणीपुरवठ्याच्या समस्या असून, त्या दूर करण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहून जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे. तसेच टंचाईच्या काळात मुख्यालय न सोडता कार्यक्षेत्रात राहून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या योजना व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची असून, त्यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांशी संवेदनशीलतेने व सकारात्मक संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने परिस्थिती गंभीर असून, धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सप्टेंबरपर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देऊन संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासन आवश्यक उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागामार्फत वांबोरी चारीच्या दोन्ही टप्प्यांतील कामांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामांसाठी सुमारे १४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाथर्डी-शेवगाव पाणीपुरवठा योजना तसेच ताजनापूर योजनेच्या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या व केटीवेअरच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. शेवगाव तालुक्यातील वडुळे केटीवेअरच्या प्रस्तावालाही तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुबार पेरणीची समस्या, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जीवन प्राधिकरणाच्या योजनांमधील अडचणी मांडल्या. शेवगाव शहरातील पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच तालुक्यातील ३२ गावांचा नदीजोड प्रकल्पामध्ये समावेश करून कायमस्वरूपी पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
बैठकीच्या प्रारंभी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीच्या तसेच ४८ हजार कोटी रुपयांच्या वीजबिल थकबाकी माफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करणारा ठराव पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेती उत्पादनात वाढ करणे हे केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


