नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीमधील जंतर-मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीतर्फे आंदोलन केले जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक १९ दिवस उपोषणाला बसले आहेत. बेमुदत उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन साडे आठ किलोने घटले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर आता देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे आले असून त्यांनी वांगचुक यांचे उपोषण थांबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटले जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार?”
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचे एक बरे असते की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचे कौतुक वाटले. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आले की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलने केली पण सरकारने काहीही केले नाही.”
भाजपाला वेगळाच माज
“निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचे द्योतक म्हणून दाखवायचे आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवले जात आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.


