अहिल्यानगर -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्याकडे बारकाईने लक्ष असले, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. स्थानिक पातळीवरील घडामोडी आणि परिस्थिती लक्षात घेऊन गरज भासल्यास त्यांच्याकडे चर्चा होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सोमवारी (20 जुलै) अहिल्यानगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेवरील सत्ता महायुतीकडेच राहील, असा विश्वास व्यक्त केला.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र निवडणूक सहकारातील असली तरी ती पक्षविरहित होईल की महायुतीमार्फत लढवली जाईल, हे अद्याप सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मुंबईत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याच्या चर्चेलाही शिंदे यांनी फेटाळले. ही जिल्ह्याची निवडणूक आहे. त्यामुळे चर्चा आणि निर्णयही जिल्ह्यातील नेतेच घेतील. मुंबईत बैठक झाल्याची चर्चा निराधार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत लक्ष घातले आहे का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले, सुरूवातीला स्थानिक पातळीवर चर्चा होईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधला जाईल. परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रश्न येईल. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता विचारली असता त्यांनी सावध भूमिका घेतली. अद्याप निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही. प्रारूप मतदार यादीही प्रसिध्द झालेली नसल्याने कोणताही अंदाज व्यक्त करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राम शिंदे यांनी यावेळी आपल्या उमेदवारीबाबतही स्पष्ट संकेत दिले. कर्जत-जामखेड मतदारसंघातून आपल्या नावाचा ठराव संबंधित संस्थांकडून करण्यात आला असून, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


