शेवगाव तालुक्यातील अमरापूर, शहाजापूर, सुलतानपूर खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबासाहेब शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीला पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्ते आणि नातेवाईक उपस्थित होते. मात्र, यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या एका आगळ्यावेगळ्या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधले असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.माजी सरपंच बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात मोठा सहभाग होता. पोथीपुराण सप्ताह, दिंडी, षष्ठी सोहळा असे अनेक धार्मिक कार्य त्यांनी आयुष्यभर केले. तसेच, त्यांना राजकारणाचा तगडा अनुभव होता. तालुक्यातील अनेक राजकीय दिग्गज मंडळी त्यांच्यासोबत संपर्कात होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना ते नेहमी पंचक्रोशीतील दिन-दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.बाबासाहेब शिंदे यांचे नाव पंचक्रोशीत अजरामर राहावे, यासाठी त्यांच्या वारसदारांनी अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला. त्यांचे पुतणे महादेव शिंदे (सर), सुपुत्र संभाजी शिंदे, भजुदास शिंदे आणि शहादेव शिंदे यांनी एक आगळावेगळा मार्ग निवडला. पारंपरिक पद्धतीनुसार अंत्यविधीची राख गंगेच्या पाण्यात टाकण्याऐवजी, त्या राखेत वृक्षारोपण करून त्या झाडांमध्ये आपल्या भावना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.आदर्शगाव वाघोलीचे सरपंच आणि भाजपचे प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. अंत्यविधीची राख झाडांना घालून बाबासाहेब शिंदे यांचे सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी कार्य पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यात आले आहे. या कौतुकास्पद निर्णयाबद्दल सर्वच स्तरातून शिंदे कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शेवगाव तालुक्यातील माजी सरपंचांना अनोखी श्रद्धांजली ;अस्थी विसर्जनाऐवजी राख घालून केलं वृक्षारोपण
- Advertisement -


