दुष्काळ जाहीर करून करपलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा
खासदार नीलेश लंके यांची मागणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी
पावसाने दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तसेच पावसाअभावी करपून व जळून गेलेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.
खा. लंके म्हणाले, जामखेड तालुक्यात शाळेच्या नवीन खोल्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलो असताना परिसरातील शेतशिवारातील पिकांची स्थिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. यावेळी अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपून गेल्याचे अत्यंत गंभीर चित्र दिसून आले. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी करून बियाणे, खते, मशागत व इतर शेतीकामांवर मोठा खर्च केला आहे. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे.
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून करपलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत. मात्र, केवळ पंचनामे करून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात काहीही अर्थ नाही. पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका खासदार लंके यांनी मांडली.
आज शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. शेतीवरील मोठा खर्च करूनही पिके हातातून जाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता वास्तव परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, असे खासदार लंके यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे, तर पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच शासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो सुरू करावेत तसेच जनावरांसाठी छावण्यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.
शासनाने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची वाट न पाहता तातडीने निर्णय घ्यावा. दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाला केवळ आश्वासनांची नव्हे, तर तातडीच्या आणि प्रत्यक्ष मदतीची गरज असल्याचेही खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे.


