अहिल्यानगर जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द झाली. त्यात प्रारूप मतदार यादीत अपात्र ठरलेल्या ३३६ मतदारांपैंकी १५९ ठरावास पात्र करण्यात आल्याने अंतिम मतदार यादीत ३८३६ मतदार मतदानास पात्र ठरविण्यात आले आहे. अंतिम मतदार यादीत बिगर शेती, शेतीपूरक मतदारसंघात मतदाराची संख्या वाढली आहे. अहिल्यानगर जिल्हा बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू असून मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. आता कोणत्याही क्षणी बँक निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.जिल्हा बँकेने १६ जून ते १६ जुलै या कालावधीत ठराव मागवले होते. जिल्ह्यातील ४ हजार १३ संस्थांनी जिल्हा बँकेसाठी ठराव दिले. त्यातील ३३६ ठराव अपात्र ठरवले. १८ ऑगस्टला जिल्हा बँकेच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी जाहीर केली. त्यात ६७७ ठराव म्हणजेच मतदार होते. प्रारूप मततदार यादीवर आलेल्या हरकतीवर सुनावणी घेतल्यानंतर मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यात ३८३६ मतदार पात्र ठरले आहेत.
प्रारूप मतदार यादीवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत होती. छाननीत अपात्र ठरलेल्या ३३६ मतदारांपैंकी २३८ हरकती आल्या. ९८ अपात्र झालेल्यांनी कोणताही आक्षेप घेतला आहे. सुनावणीत त्यातील १५९ हरकतींना ग्रीन सिग्नल दर्शवत त्यांची नावे पात्र ठरवण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीत हा आकडा वाढून ३८३६ मतदार झाले.अंतिम मतदार यादीत सोसायटी मतदार संघातील प्रारुपच्या १३६० मतदारांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र बिगरशेती मतदार संघात ९१ मतदार वाढले आहेत. तर शेतीपूरक मतदार संघात ६८ मतदारांची वाढ झाली आहे. ही मतदार संख्या चुरस वाढविणारी असल्याचे बोलले जाते.
यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगणार असे वाटत असतानाच, सहकाराच्या या राजकारणात दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून तिसरे स्वतंत्र पॅनल उभे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू असतानाच, सेवा संस्थांच्या 14 पैकी 10 जागांवर नेत्यांमध्ये सहमती झाल्याचे समजते. मात्र, सेवा संस्थांच्या उरलेल्या 4 आणि इतर 7 अशा एकूण 11 जागांवर अजूनही पेच कायम आहे. यामध्ये महिलांसाठीच्या 2 जागा, बिगर शेती मतदारसंघ (1), शेतीपूरक मतदारसंघ (1) तसेच अनुसूचित जाती/जमाती , भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय (जइउ) प्रत्येकी 1 अशा 3 राखीव जागांवर एकमत झालेले नाही. त्यामुळे या जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


