अहिल्यानगर-राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने प्रलंबित आहेत.
यामुळे या निवडणुका झाल्याशिवाय मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणे शक्य नाही. यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. यात नगर जिल्ह्यातील ८६६ ग्रामपंचायतींचा समावेश असून यातील ९९ ग्रामपंचायती मागील वर्षीच्या आहेत.चालूवर्षी जानेवारीपासून मुदत संपण्यास सुरुवात होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने किंवा वर्षभर लांबणीवर जाणार आहेत. २०२६ मध्ये राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या मुदत संपणार आहेत. यात नगर जिल्ह्यातील चालू वर्षीच्या ७६७ ग्रामपंचायती असून यातील ज्यांच्या मुदत जसजशी संपेल तसतशी त्या ठिकाणी प्रशासक राज लागू होणार आहे.
नगर जिल्ह्यात २०२५ मध्ये मुदत संपलेल्या ९९ ग्रामपंचायती असून त्या ठिकाणी सध्या प्रशासक राज अस्तित्वात आहे. दरम्यान, नव्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाचे अपर सचिव बाबुराव सोलसे यांनी काढले आले असून त्यानुसार जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे.
राज्यात विभागनिहाय मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नाशिक विभागात २ हजार ४७६ ग्रामपंचायती, अमरावती विभागात २ हजार ४५१ ग्रामपंचायती, नागपूर विभागात १ हजार ५०८ ग्रामपंचायती, कोकण विभाग ७९८ ग्रामपंचायती, पुणे विभाग २ हजार ८७० ग्रामपंचायत आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ४ हजार १३४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ठिकाणी आता प्रशासक राज येणार येणार आहे.
नगर जिल्ह्यात प्रशासक राज येणाऱ्या ग्रामपंचायती
अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, नेवासा ५९, पाथर्डी ७८, शेवगाव ४८, कर्जत ५६, जामखेड ४७, पारनेर ८८, श्रीगोंदा ५९ एकूण ७६५ असे आहेत.


