अहिल्यानगर जिल्हा भाजप कार्यकारणी बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गैरहजेरीवरून आमदार राम सातपुते यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सभापती राम शिंदे, आमदार राम सातपुते आणि जिल्हा प्रभारी भैरवी वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र, महापालिकेच्या नवनिर्वाचित २७ नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिल्याने राम सातपुते यांनी भाषणातूनच नाराजी व्यक्त केली. भाजपच्या चिन्हावर निवडून आलो आहोत, याचा विचार नगरसेवकांनी करायला हवा, असं सातपुते म्हणाले. तसेच, कार्यकर्ता चुकत राहिला तर भारतीय जनता पार्टीला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. पक्षाची बैठक होत असेल तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे, असंही सातपुतेंनी सुनावलं.
आपल्या शहरात पक्ष कार्यकारणीची बैठक होत आहे. नगरसेवकांना याच गांभीर्य असल पाहिजे. मी 250 किलोमीटर लांबून आलो. आमदार आले आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे इथे आले आहे. परंतु त्यांना देखील माहिती आहे की ते सर्वात आधी पक्षाचे कार्यकर्ते आहे. ते कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धातास आधी आले आणि पूर्णवेळ थांबले याला कार्यकर्ता म्हणतात. त्यांचा निवडणुकीत पराभव होऊन देखील त्यांना पक्षाने सभापती केले. त्याची जाणीव त्यांना आहे. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले.


