राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. येत्या 6 जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी अगोदरच पार पडल्याची माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
अजित पवार यांचे 28 जानेवारीला निधन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर लगेच 30 तारखेला अजित पवार यांचा अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचदिवशी सोनगाव येथील कऱ्हा-नीरेच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. यानंतर अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, हा दशक्रिया विधी तिसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारीला पार पडल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली.
सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता 10 व्या किंवा 13 व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.


