अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याच्या दिवशी भयंकर घटना घडली. शेतकऱ्याने विष प्राशन करून आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने जीवन यात्रा संपवली. नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथे ही घटना घडली. बैलपोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगरमध्ये आठवडाभरात शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नानासाहेब केशव ठोबळ (४५ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खत आणि औषधे घ्यायला पैसे नसल्यामुळे या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचललं असल्याचे सांगितले जात आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिह्यात गेल्या आठ दिवसात शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना घडली आहे.
१७ ऑगस्ट रोजी नेवासाच्या वडूले गावातील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्याने जीवन संपवले. नानासाहेब ठोबळ यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. ठोबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी वर्गणी काढून पैसे काढत अंत्यसंस्कार केले. प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी ही माहिती दिली. या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेले बळी असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.


