पारनेर -तालुक्यातील वडगाव सावताळ येथे बनाईदेवी यात्रोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावणारी निंदनीय घटना घडली आहे. यात्रोत्सवानिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान काही मद्यधुंद तरुणांनी तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात केवळ पुरुष कलाकारच नव्हे, तर महिला कलाकारांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.
दि. १२ एप्रिल रोजी यात्रेनिमित्त दिपाली आनंदा भोसले यांच्या तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री दहाच्या सुमारास कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच रविंद्र शिंदे, अमोल शिंदे आणि बाळू बर्डे या प्रमुख संशयितांसह इतर ४ ते ५ जण मद्यधुंद अवस्थेत स्टेजजवळ आले. त्यांनी कार्यक्रम कधी सुरू होणार यावरून सुरुवातीला वाद घातला आणि त्यानंतर अचानक सात-आठ जणांच्या टोळयाने कलावंतांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली.
हा वाद एवढ्या थराला गेला की हल्लेखोरांनी कलावंतांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या गणेश अष्टीकर भोसले यांच्यावर लोखंडी खुट्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. या टोळयाने महिला कलाकारांचे कपडे फाडून असभ्य वर्तन केले. केवळ शारीरिक इजा करूनच हे हल्लेखोर थांबले नाहीत, तर त्यांनी तमाशातील ऑर्गन, ढोलकी, माईक, मिसर आणि साऊंड सिस्टिम यासारख्या वाद्यांची आणि साहित्याची तोडफोड केली. या तोडफोडीत कलावंतांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. या भयंकर प्रकारामुळे कलावंतांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अखेर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे लोककलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामीण भागात अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.


