अहिल्यानगर-केडगाव येथील कोतकर मळा परिसरात सामाईक रस्त्याच्या कारणावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. जुन्या वादाची कुरापत काढून शेती व्यवसाय करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबावर शेजाऱ्यांनीच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकू, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करण्यात आला असून, पीडित कुटुंबाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहादु किसन कोतकर (वय 60 वर्ष) हे आपल्या कुटुंबासह कोतकर मळा परिसरात राहतात. सामाईक रस्त्यावरून जात असताना आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर कोतकर, ऋतुजा ज्ञानेश्वर कोतकर, सुमन उर्फ बबई यादव कोतकर आणि ऋषीकेश यादव कोतकर यांनी त्यांना रस्त्यात अडवले. तुम्ही सर्वजण इथे कसे राहता तेच मी पाहतो, अशी धमकी देत आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी माऊली याने चाकू सारख्या धारदार शस्त्राने फिर्यादींवर वार केले. तर ऋषीकेश याने लाकडी दांडक्याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. इतर आरोपींनी दगडाने मारहाण करत लाथाबुक्क्यांनी गंभीर जखमा केल्या. या संपूर्ण झटापटीत पीडित कुटुंबातील सदस्यांचे दागिनेही गहाळ झाले आहेत.
जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वास गाजरे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


